मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी

मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी रात्री तसेच गुरुवारी पहाटेपर्यंत आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस अथवा मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात.
मुंबईतील कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मेघगर्जना आणि विजांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो उघड्या जागेत जाणे टाळावे, झाडांखाली उभे राहू नये तसेच वीज पडण्याच्या घटनांपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढत असून येत्या काही दिवसांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



