“३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा; मुख्यमंत्र्यांची मोठी अपडेट”

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा करत ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चा पार पडली असून काही जिल्ह्यांकडून अतिरिक्त माहिती मागवण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रक्रिया वेगाने सुरू केली जाईल आणि ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल.
दरम्यान, बच्चू कडू आणि शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने जून महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
याच कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कर्जमाफीबाबत सकारात्मक संकेत दिले. पुणे ॲग्री हॅकेथॉन कार्यक्रमात बोलताना त्यांनी शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला.
भरणे म्हणाले की, शेतकरी सुखी आणि समाधानी राहावा ही राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून आता सर्वांच्या नजरा अधिकृत कर्जमाफीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.



