पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाचा मोर्शीत जल्लोष; फटाके, घोषणांनी शहर दणाणलं

मोर्शी (अमरावती) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच देशभरात राजकीय वातावरण तापलं असून, पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाचा आनंद अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मोर्शी शहरातील जयस्तंभ चौक परिसरात, गणपती मंदिराजवळ भाजपाच्या वतीने विजय जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते. निकाल जाहीर होताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत विजयाचा आनंद साजरा केला.
यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, घोषणाबाजी करत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात विजय साजरा केला.
“भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि भाजपाच्या समर्थनार्थ घोषणांनी जयस्तंभ चौक परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा आनंद व्यक्त केला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय आहे,” अशी भावना व्यक्त केली.
मोर्शी शहरात रंगलेल्या या विजय जल्लोषामुळे परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे शहरात काही काळ सणासुदीचं वातावरण पाहायला मिळालं.



