citynewsLatest NewsMaharashtra

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवी”; १ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती – प्रताप सरनाईक

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर किमान कामचलाऊ मराठी येणे आवश्यक आहे, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. १ मेपासून राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मूलभूत मराठीत संवाद साधणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी सोमवारी केली.

मंत्रालयात रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मेपासून हा नियम लागू करण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील अमराठी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा हा निर्णय ४ मे रोजी प्रस्तावित संपाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. अमराठी चालक संघटनांनी ४ मे रोजी संपाचा इशारा दिल्यानंतर या मुद्द्यावर राज्यभरात वाद निर्माण झाला होता.

या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत रिक्षा-टॅक्सी संघटनांनी मराठी भाषेच्या अटीला तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. मात्र, ही अट लागू करण्यासाठी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्षाची मुदत देण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक भाषेचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. विशेषतः प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी सेवांमध्ये मराठीला अधिक प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button