भीषण अपघात! कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर इको कार–मिक्सरची जोरदार धडक; ८ ठार, १ गंभीर

कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी अत्यंत भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रायची पूलाजवळ नव्याने उभारलेल्या पुलावर इको कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ही इको कार कल्याण–मुरबाड दरम्यान प्रवासी वाहतूक करत होती.
अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, कारमधून ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेहांना सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



