जळगाव हादरले, शेतात एकाच दोरीने पती-पत्नीची आत्महत्या; दोन चिमुकले पोरके

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव या दाम्पत्याने आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर शिवारातील स्वतःच्या शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने दोघांनी गळफास घेतला. ही घटना त्यांच्या घरापासून अवघ्या 300 फूट अंतरावर घडली. स्थानिकांनी तत्काळ त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
या दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुले आहेत. शिक्षणासाठी बाहेरगावी असलेल्या मुलांना आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदी संसाराचा असा अचानक अंत झाल्याने शिवापूर गावात शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील तणाव आणि अडचणींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



