खाडी संकटावर भारत सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी २४x७ हेल्पलाइन, इस्रायलमधून स्थलांतर सुरू

मिडल ईस्टमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार पूर्णपणे सतर्क झाले असून परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव Aseem R Mahajan यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली असून ती २४ तास कार्यरत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.
सरकारकडून विविध राज्य सरकारे आणि परदेशातील भारतीय समुदायाशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, नागरिकांसाठी वेळोवेळी अॅडव्हायजरी जारी केली जात आहे. या अॅडव्हायजरीमध्ये प्रवास, सुरक्षा आणि स्थानिक परिस्थितीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गरज पडल्यास व्हिसा, प्रवास आणि स्थलांतर (Evacuation) याचीही व्यवस्था केली जात असून इस्रायल मधून भारतीय नागरिकांची सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, UAE, ओमान आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांदरम्यान विमान सेवा सुरू असली, तरी काही ठिकाणी एअरस्पेस बंद असल्यामुळे अडचणी येत आहेत. तरीही सध्या शेकडो उड्डाणे सुरू असून, आतापर्यंत २,१९९ उड्डाणांद्वारे सुमारे ४.२६ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खाडीतील तणावपूर्ण परिस्थितीत भारत सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे… पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…



