इराण-इजरायल युद्धाचे पडसाद; अमरावतीत गॅस तुटवड्यामुळे ५०% बार-रेस्टॉरंट बंद

अमरावती शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत सापडला असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. इराण आणि इजरायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक स्तरावर जाणवू लागला आहे.
जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना बसत आहे.
अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तब्बल ५० टक्के बार आणि रेस्टॉरंट बंद पडले आहेत. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.
काही व्यावसायिकांनी पर्याय म्हणून हातभट्टीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत उर्वरित हॉटेल व्यवसायही बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संकटामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता असून, व्यवसायिकांनी सरकारकडे तात्काळ हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे आंतरराष्ट्रीय युद्ध आणि दुसरीकडे स्थानिक व्यवसायावर त्याचे गंभीर परिणाम… अमरावतीतील ही परिस्थिती चिंताजनक असून, सरकारने तातडीने पावले उचलणं अत्यावश्यक ठरणार आहे…



