वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; 260 गावांमध्ये प्रशासनाच्या विशेष उपाययोजना

मान्सूनच्या विलंबाचा परिणाम; विहिरी, बोअरवेल आटल्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मदत
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यात मान्सूनला होत असलेल्या विलंबामुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जिल्ह्यातील जलस्रोतांवर दिसून येत असून अनेक विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्रोतांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही ठिकाणी जलस्रोत पूर्णपणे आटल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
पाणीटंचाईची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील 260 गावांमध्ये तब्बल 255 पाणीटंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मागील दोन महिन्यांपासून वाढलेल्या तापमानामुळे ग्रामीण भागातील जलस्रोतांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने 125 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच चार गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. वाशिम तालुक्यातील जांभरूण आणि परांडे परिसरातील शेतकऱ्यांच्या दोन विहिरीही प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
दरम्यान, मान्सूनला आणखी विलंब झाल्यास खरीप हंगामावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. पाऊस लवकर न आल्यास पिण्याच्या पाण्यासोबतच शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



