मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग वर आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, राज्यातील अपघातांच्या मालिकेत आणखी एक भर पडली आहे. ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवर प्रवास करणाऱ्या तिघांना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने चिरडले. अपघात इतका भीषण होता की तिघांच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र पोलीस व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असून, मनोर पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



