मेळघाटातील पहिलं डिजिटल गाव आज घाणीच्या विळख्यात

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील हरीसाल गाव, जे काही वर्षांपूर्वी देशाचं पहिलं डिजिटल व्हिलेज म्हणून ओळखलं गेलं होतं, आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. गावातील प्राथमिक शाळा असो, उपकेंद्र असो किंवा ग्रामपंचायत कार्यालय — सर्वत्र फक्त घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे. ग्रामसेवकाच्या सतत गैरहजेरीमुळे गावातील अनेक कामं थांबली आहेत. सदर ग्रामसेवक पेसा निधी आणि सामान्य फंड कुठे खर्च होतो, याबाबत ग्रामस्थांना माहिती देत नाही. यामुळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हरीसालच्या फैल ढाणा भागात, जिथे मोठा बाजार भरतो, त्या ठिकाणीसुद्धा कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव पाहायला मिळतो.
गावातील नागरिक म्हणतात — “हेच का डिजिटल गाव?” तर ग्रामसेवकाचं उत्तर मात्र नेहमीप्रमाणे — “ऑल इज वेल!”
दरम्यान, धारणी गटविकास अधिकारी यांचं लक्षसुद्धा या गावाकडे नाही, अशी तीव्र नाराजी गावकऱ्यांमध्ये आहे.
आता अमरावती जिल्हा प्रशासन आणि उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष देऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



