मूर्तिजापूर कबड्डी स्पर्धेत बोगस खेळाडूंचा प्रकार उघड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने मूर्तिजापूर येथे सुरू असलेली विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा या वर्षी संतापजनक प्रकारांमुळे चर्चेत आली आहे. लाल शाळा मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप होत आहेत.
पाण्याची, नाश्त्याची आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था नव्हती. मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमचाही अभाव होता, मैदानाची स्थिती बिकट, पंच कमिटीमध्ये गोंधळ – हे सर्व पाहून खेळाडू, शिक्षक आणि पालक चिडले. अनेक संघांना सकाळपासून रात्रीपर्यंत खेळावे लागले, पोटात अन्न नाही, तहान भागवण्यासाठी पाणीही नाही. दरम्यान, अंतिम सामन्यात अमरावती ग्रामीण विरुद्ध वाशीम असा सामना खेळला जात असताना, अमरावतीच्या प्रशिक्षक सुयोग गोरले यांनी वाशीम संघात बोगस खेळाडू असल्याची तक्रार केली. १००० रुपये फी भरून तक्रार दाखल केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्यास नकार दिला.
सामना संपल्यानंतर कागदपत्रे तपासल्यावर काही खेळाडूंची आधारकार्ड आणि शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.
तरीही वाशीम संघाला पाठबळ देत निकाल दाबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. फक्त अमरावतीच नव्हे, तर अकोला संघालाही याच अन्यायाला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात आले आहे. काही शिक्षकांनी मराठवाड्यातील मोठ्या वयाच्या खेळाडूंना आपल्या शाळेच्या नावावर खेळवून विदर्भातील गुणवान विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. जर पुढील दोन ते तीन दिवसांत अमरावती ग्रामीण संघाला न्याय मिळाला नाही, तर जिल्ह्याभरातील खेळाडू आंदोलन छेडतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.



