१४ महिने निद्रिस्त घरकुल योजना, गरीब जनता वंचितच

नांदगाव : प्रधानमंत्री आवास योजना ही खरं तर प्रत्येक गरजवंत कुटुंबाला स्वतःचं घर मिळावं म्हणून सुरु झाली. पण नांदगाव पंचायत समितीतील घरकुल योजना अधिकाऱ्यांनी या योजनेलाच चिरडून टाकल्याची गंभीर आरोप जनतेतून होत आहेत. २४ जानेवारी २०२४ रोजी दाखल झालेला तक्रार अर्ज आजतागायत रखडलेलाच आहे. तब्बल १४ महिने अधिकारी निद्रिस्त आहेत. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा, पण हे अधिकारी त्याहूनही पुढे गेलेत, असा टोला ग्रामस्थ लगावत आहेत. ज्यांच्याकडे आधीच पक्की घरे आहेत, त्यांना पुन्हा नवे घर मंजूर केले जाते, तर खरी गरीब जनता वंचित राहतेय. यामुळेच रोहिले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आता लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार आहेत. १० सप्टेंबरपासून हे उपोषण सुरु होणार असून, तालुक्यात मोठा राजकीय व सामाजिक वादळ उठणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. नवीन जिल्हा परिषद अधिकारी नुकतेच रुजू झाले आहेत. भ्रष्टाचार आणि चिरीमिरीच्या कचाट्यात अडकलेल्या घरकुल योजना अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत.



