मनपा उर्दू स्कूलच्या १२वीच्या पहिल्याच बॅचचा शानदार निकाल – ९६% विद्यार्थी उत्तीर्ण

अमरावती : जमील कॉलनी येथे स्थित असलेल्या मनपा उर्दू शाळेच्या १२वीच्या पहिल्याच बॅचने सोमवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये ९६ टक्के यश मिळवून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या वर्षी ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मनपा शिक्षाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शाळा पूर्वी केवळ १०वी पर्यंतच मर्यादित होती. त्यामुळे १०वी नंतर विद्यार्थ्यांना खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागत असे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मनपा शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपूर्वी शासनाकडून विज्ञान शाखेला मान्यता मिळाली.
या पहिल्याच बॅचने मिळवलेल्या यशामुळे शाळेचा दर्जा आणि गुणवत्तेची झलक स्पष्ट दिसून आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी मनपा आयुक्त सचिन कालान्तर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर, सिस्टम मॅनेजर अमित डेंगरे आणि शिक्षाधिकारी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.



