आयुष्मान भारत योजनेतील रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप

होप हॉस्पिटलमध्ये उपचार आणि सुविधा वेळेत न मिळाल्याचा नातेवाईकांचा दावा; युवा सेनेकडून निष्पक्ष चौकशीची मागणी
नागपूर : नागपुरात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विठ्ठल तुकाराम साठे यांना पुढील उपचारासाठी टेका नाका परिसरातील होप हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात आवश्यक उपचार आणि वैद्यकीय सुविधा वेळेत मिळाल्या नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यासोबतच उपचाराच्या नावाखाली अतिरिक्त पैसे आकारल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल तुकाराम साठे यांना आयुष्यमान हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी होप हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना नियमानुसार उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळणे अपेक्षित असते.
मात्र, होप हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णाला आवश्यक उपचार आणि सुविधा वेळेत मिळाल्या नसल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. तसेच आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार होत असतानाही अतिरिक्त रक्कम आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात युवा सेनेकडून उपचारातील कथित निष्काळजीपणावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. डॉ. मुरली आणि डॉ. रूबी यांच्या उपचार पद्धतीमुळे आणि कथित निष्काळजीपणामुळे विठ्ठल साठे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचेही या प्रकरणातून समोर आले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाची भूमिका, रुग्णाला देण्यात आलेले उपचार, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या का, उपचाराच्या नावाखाली कोणती रक्कम आकारण्यात आली आणि आयुष्मान भारत योजनेच्या नियमांचे पालन झाले की नाही, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशीमध्ये संबंधितांकडून नियमांचे उल्लंघन किंवा उपचारातील निष्काळजीपणा आढळून आल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही युवा सेनेने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन नेमके सत्य समोर यावे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी भूमिका युवा सेनेकडून मांडण्यात आली आहे. प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी कशी पुढे नेते, याकडे आता लक्ष लागले आहे.



