माहूरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष; भव्य मिरवणूक, चौकाचे नामकरण आणि विचारांना अभिवादन

हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ नामकरणाने सोहळ्याला ऐतिहासिक स्वरूप
माहूर (जि. नांदेड) | प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात झालेल्या या सोहळ्यात सामाजिक समता, श्रमिकांचा सन्मान आणि परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. यावेळी एका चौकाचे ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ असे नामकरण करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. डीजेच्या तालावर आणि घोषणांच्या गजरात संपूर्ण माहूर शहर उत्साहाने दुमदुमून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी आणि पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज किर्तने यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मातोश्री किराणा समोरील चौकाचे ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ असे नामकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या निर्णयाचे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
यावेळी मनोज किर्तने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. ‘फकिरा’ आणि ‘वैजयंता’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी कष्टकरी, श्रमिक आणि वंचित समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या. तसेच लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन आणि अन्यायाविरोधातील लढ्याचा संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन जयंती उत्सव समिती आणि माहूरमधील युवकांनी केले. सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.
जयंती सोहळ्याची सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या घोषणांनी झाली. श्रमिकांच्या संघर्षाची परंपरा, सामाजिक समतेची मूल्ये आणि परिवर्तनाची प्रेरणा जपणारा हा उत्सव माहूर शहरासाठी संस्मरणीय ठरला.



