AmravaticitynewsLatest NewsLaturMaharashtraWeather Report

Maharashtra Weather Alert : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, तर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानाने दुहेरी इशारा दिला आहे.
एकीकडे राज्यातील अनेक भागांत सूर्य आग ओकणार असून उष्णतेची तीव्रता वाढणार आहे, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 6 मे रोजी राज्यातील 7 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात उकाडा वाढणार असून दुपारच्या वेळी उष्माघाताचा धोका अधिक राहणार आहे. मुंबईत कमाल तापमान 36 अंशांपर्यंत, तर ठाण्यात 39 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

कोकणात उकाडा वाढणार
कोकण विभागात उष्णतेसोबतच दमट हवामानामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हवामान कोरडे राहील, मात्र उष्णतेचा चटका तीव्र जाणवेल. विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा जोर
पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात दुपारी गरम वारे वाहू शकतात. सोलापूर जिल्ह्यासाठी अधिकृत अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात तापमानात वाढ होणार असून दुपारच्या वेळेत उष्णतेचा अधिक त्रास जाणवेल. हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पावसाचा इशारा
मराठवाड्यात लातूरसाठी मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यासाठी अधिकृत अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, यवतमाळसह बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवू शकते. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 दरम्यान अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तर पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button