गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेला अंदाज अचूक ठरत आज गोंदिया जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला. सकाळपासूनच उष्णता जाणवत असताना दुपारनंतर आकाश ढगांनी व्यापले आणि काही वेळातच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः कापणीस आलेली धान्य पिके, आंबा बागा तसेच भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
हवामान विभागाने आधीच गोंदिया जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला होता, जो आज प्रत्यक्षात उतरताना दिसला. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील काही तासांतही अशाच स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



