गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे टीसीएसची प्रथमच कॅम्पस ड्राइव्ह – ८ विद्यार्थ्यांची निवड

गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रथमच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस (BPS) विभागांतर्गत बॅक ऑफिस ऑपरेशन्स, डेटा प्रोसेसिंग आणि ट्रान्झॅक्शन्स या पदांसाठी भव्य कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.या कॅम्पस ड्राइव्हला TCS चे अधिकारी अर्पित रहमतकर, तनय सचदेवा आणि चेतन जुनगडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या मंचावर गो. से. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. एच. एस. चांडक मान्यवर म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एच. एस. चांडक यांच्या स्वागत व प्रस्ताविक भाषणाने झाली. त्यानंतर प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत आत्मविश्वासाने संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. TCS अधिकारी अर्पित रहमतकर यांनी निवड प्रक्रिया, आवश्यक पात्रता, कौशल्ये आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. एकूण ५८ विद्यार्थ्यांनी या ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला. निवड प्रक्रिया ५० गुणांच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेने सुरू झाली. यापैकी ५३ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले, तर ५ विद्यार्थी कट-ऑफ गुण मिळवू शकले नाहीत. त्यानंतर तनय सचदेवा यांनी तांत्रिक मुलाखती घेतल्या, तर HR मुलाखती अर्पित रहमतकर आणि चेतन जुनगडे यांनी पार पाडल्या. संपूर्ण आणि काटेकोर मूल्यमापनानंतर ८ विद्यार्थी निवड झाले व त्यांना TCS, नागपूर येथे नियुक्तीची संधी प्रदान करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष शंकरराव (दादासाहेब) बोबडे, प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर आणि डॉ. एच. एस. चांडक यांच्या हस्ते करण्यात आला. प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. एच. एस. चांडक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध आहे. पुढील काळातही अशा नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन केले जाईल. खामगाव व परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधींचा नक्की लाभ घ्यावा.” या कॅम्पस ड्राइव्हमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



