भर पावसात नवनीत राणांकडून दोन लाख कुटुंबांना दिवाळी किराणा वाटप

अमरावतीच्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरासह ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी किराणा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. पाऊस सुरू असतानाही राणा यांनी स्वतः उपस्थित राहून हा उपक्रम चालू ठेवला. युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कुटुंबांना किराणा बॅग्स दिल्या जात आहेत. या बॅगमध्ये सुमारे १० ते १५ किलोचा दिवाळीचा किराणा समाविष्ट असून, यात तांदूळ, डाळ, साखर, तेल, रवा, मिठाईचे पदार्थ अशा अनेक वस्तू आहेत. या उपक्रमाविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, दिवाळी हा आनंदाचा सण आहे. आपल्या मतदारसंघातील गरीब आणि गरजू लोकांची दिवाळीही आनंदात साजरी व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित दिसावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. काही लोक विचारतात या किराण्याने काय होते, पण जेव्हा एखाद्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, तेव्हा वाटतं की हीच खरी दिवाळी आहे. राणा दाम्पत्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, लोकांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.



