आसामच्या महापुरात 25 वर्षीय तरुण ठरला देवदूत; 2 हजारांहून अधिक नागरिकांचे वाचवले प्राण

कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नाही, आधुनिक साधने नाहीत; पारंपरिक बोटीच्या साहाय्याने श्रवण कुमारची धाडसी बचावमोहीम
आसाम | प्रतिनिधी
आसाममध्ये यंदाच्या मान्सूनमुळे आलेल्या भीषण महापुराने लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली असून हजारो कुटुंबे संकटात सापडली आहेत. अशा बिकट परिस्थितीत कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसलेला २५ वर्षीय श्रवण कुमार हा तरुण हजारो पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने आपल्या सहकाऱ्यांसह दोन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवून मानवतेचा आदर्श घालून दिला आहे.
आसाममधील चराईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाटसह अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाच्या महापुराने मोठे नुकसान केले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आणि अनेक गावे जलमय झाली. या आपत्तीत ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सात लाखांपेक्षा अधिक नागरिक बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.
याच संकटाच्या काळात दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या श्रवण कुमारने कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता स्वतःच बचावकार्य सुरू केले. त्याच्याकडे आधुनिक मोटरबोट किंवा विशेष बचाव साहित्य नव्हते. मात्र नदीचा अनुभव आणि पारंपरिक लाकडी ‘तुलुंगा’ बोटीच्या साहाय्याने त्याने मित्रांसोबत पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्धार केला.
१९ जुलैच्या पहाटे नदीच्या पाण्याचा वेग वाढत असल्याचे लक्षात येताच श्रवणने मोठ्या पुराचा अंदाज घेतला. गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होताच त्याने तातडीने बचावकार्य सुरू केले. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले.
अंधार, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि जीवघेण्या परिस्थितीतही श्रवण कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सलग दोन दिवस आणि दोन रात्री बचावकार्य सुरू ठेवले. या मोहिमेदरम्यान दोन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अभिनेता रणदीप हुडा यांनीही पूरग्रस्त भागांना भेट देत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि मदत साहित्याचे वितरण केले. राज्यात अद्यापही अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
आसामच्या या नैसर्गिक आपत्तीत श्रवण कुमारने दाखवलेले धैर्य, निस्वार्थ सेवा आणि मानवतेची भावना देशभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. संकटाच्या काळात कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा माणुसकी, धाडस आणि मदतीची भावना अधिक महत्त्वाची ठरते, याची प्रचिती त्याच्या कार्यातून पुन्हा एकदा आली आहे.



