TET व शाळाबाह्य कामांच्या विरोधात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमरावतीतील बहुतांश शाळा बंद; विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात शिक्षकांचा एल्गार
अमरावती | प्रतिनिधी
TET परीक्षा आणि शिक्षकांवर वाढत चाललेल्या शाळाबाह्य कामांच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. शिक्षकांनी टीईटी परीक्षेसंदर्भातील धोरणात बदल करण्याची तसेच शिक्षकांवर सोपविण्यात येणारी शाळाबाह्य कामे कमी करण्याची मागणी केली.
शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, अध्यापनाव्यतिरिक्त सातत्याने विविध प्रशासकीय आणि शासकीय कामांची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापनाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शाळाबाह्य कामांतून मुक्त करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद राहिल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनात व्यत्यय आला.
शिक्षक संघटनांनी सरकारला इशारा देत, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



