नाशिकमध्ये काळजाचा थरकाप; गर्भवती महिलेसह चौघांचा बुडून मृत्यू, २ वर्षांची चिमुकली बचावली

नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला असून पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत महिलेला गर्भधारणा असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे हे दाम्पत्य आपल्या परिचितांच्या दोन लहान मुलांसह कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. हे सर्वजण मखमलाबाद नाका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
धरण परिसरात पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाण्यात बुडाल्यानंतर चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत दोन वर्षांची एक चिमुकली सुदैवाने बचावल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये आनंदासाठी गेलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. पाणवठे आणि धरण परिसरात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



