टांड्यात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, उपचारापूर्वीच मृत्यू

टांडा येथील खरड खुर्द गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरड खुर्द गावातील सलोनी (वय ८ वर्षे) ही चिमुकली आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घराबाहेर गेली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.
शोधादरम्यान कुटुंबीयांना काही भटके कुत्रे सलोनीवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेत चिमुकलीची सुटका केली आणि तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे खरड खुर्द गावासह संपूर्ण टांडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाविरोधात रोष वाढताना दिसत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर तातडीने नियंत्रण आणण्याची आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



