मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 15 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात

उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य जलसंकट लक्षात घेता, मुंबईत 15 मेपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी (28 एप्रिल) ही माहिती दिली. मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत राखण्यासाठी आणि भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अश्विनी भिडे म्हणाल्या, “एल निनोच्या परिणामाचा विचार करता मुंबईचा पाणीपुरवठा चांगल्या स्थितीत राहावा यासाठी 15 मेपासून 10 टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, मुंबईसाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे भातसा आणि वैतरणा धरणांतून अतिरिक्त पाणी राखीव देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना 15 मेपासून पाणी वापरात काटकसर करावी लागणार आहे. घरगुती वापरासोबतच व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स, बांधकाम प्रकल्प आणि इतर क्षेत्रांनाही या कपातीचा परिणाम जाणवणार आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे आणि पावसाळ्यापूर्वीच्या काळात पाण्याची मागणी वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा दीर्घकाळ सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही पाण्याचा जपून आणि जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत 15 मेपासून लागू होणारी 10 टक्के पाणी कपात ही आगामी जलसंकटाची गंभीर सूचना मानली जात असून, नागरिकांनी आतापासूनच पाणी बचतीच्या सवयी अंगीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.



