नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी SRPF भरती परीक्षा अमरावतीत पार; १५९ जागांसाठी १५५० उमेदवार मैदानात

नक्षलग्रस्त भागातील पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी SRPF गट १८ (IRB-5) भरतीची लेखी परीक्षा आज अमरावतीत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत मोठ्या संख्येने उमेदवारांनी सहभाग घेतला.
बडनेरा येथील राम मेघे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. SRPF गट १८ अंतर्गत एकूण १५९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, त्यासाठी तब्बल १५५० उमेदवार परीक्षेला बसले. त्यामुळे यंदाची स्पर्धा चांगलीच चुरशीची असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती. परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमेदवारांची तपासणी, ओळख पडताळणी आणि परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
मुख्य समादेशक सुशांत सिंग तसेच सहसमादेशक शेलोटकर आणि रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडली.
नक्षलग्रस्त भागातील युवकांना पोलीस दलात सामील होण्याची आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये स्थानिक युवकांची पोलीस दलात भरती झाल्यास सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.
परीक्षा पार पडल्यानंतर आता सर्व उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.



