जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. रामनगर परिसरातील डोंगराळ रस्त्यावर बस खोल दरीत कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. उधमपूरकडे निघालेली बस रामनगर परिसरातील एका धोकादायक वळणावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट खोल दरीत कोसळली.
अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिक सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत बसच्या अवशेषांमधून जखमींना बाहेर काढले. त्यानंतर पोलीस, आपत्कालीन सेवा पथके आणि बचावदल घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकांनी बसच्या अवशेषांमधून १५ मृतदेह बाहेर काढले असून, २० जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
ही बस एका दुर्गम गावातून उधमपूरकडे जात होती. अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उधमपूरचे उपायुक्त मिंगा शेर्पा यांच्याशी संपर्क साधला. गंभीर जखमींना हवाई मार्गाने मोठ्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “या अपघातात झालेल्या जीवितहानीची बातमी अत्यंत वेदनादायक आहे,” असे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.



