संत गाडगेबाबांची दशसूत्री व ग्रामविकासावर अमरावती विद्यापीठात उद्या एकदिवसीय कार्यशाळा

अमरावती (दि. 22.03.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, सोमवार २३ मार्च २०२६ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संत गाडगेबाबांची दशसूत्री व ग्रामविकास’ हा या कार्यशाळेचा मुख्य विषय असून, ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज आणि विकास प्रक्रियेवर यात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल रिसर्च सेंटर येथे सकाळी ११:०० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. हर्षवर्धनजी देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळा चे आजीवन प्रचारक आचार्य श्री. हरिभाऊ वेरुळकर गुरुजी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. श्रीमती विद्या शर्मा आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यशाळेत ग्रामविकासाशी संबंधित विविध तांत्रिक आणि सामाजिक विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त झालेल्या प्रशासकाची जबाबदारी आणि भूमिका’ यावर सौ. लिनाताई तुरकर,ट्रेनर, यशदा व सल्लागार, महाराष्ट्र सरपंच संघटना ह्या मार्गदर्शन करतील. ‘शासकीय योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर’ महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराळे भाष्य करतील. याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी द्यावी, याबाबत ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ते याचिकाकर्ते श्री अरविंद दळवी यांचा सत्कार व मार्गदर्शन होणार आहे. यावेळी विविध विषयाचे निराकरण महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना विदर्भ प्रमुख अॅड. देवा पाचभाई आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मोताळा, जि. बुलढाणा येथील महाविद्यालयात विकास समितीचे सदस्य श्री. अनिल उर्फ अण्णा पाटील हे उपस्थितांच्या शंकांचे निरसन करतील.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेचा समारोप दुपारी ४:०० वाजता चहापान आणि प्रमाणपत्र वितरणाने होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. दिलीप काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आणि महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना चे अध्यक्ष श्री. गजानन बोंडे यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



