“चिमणी जाते की काय?”—कामरगावातील विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून पर्यावरणाचा हृदयस्पर्शी संदेश

कामरगाव, प्रतिनिधी :
“चित्ता गेला, डोडो गेला… आता कुणाचे नाव? चिमणी जाते की काय?”—या सवालाने कामरगावात प्रत्येकाच्या मनाला भिडणारा इशारा दिला. चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याद्वारे चिमण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या उपक्रमातून सामाजिक जागृती घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कामरगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालयात चिमणी दिन उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. चिवचिव मंडळ आणि इको क्लब ऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. विद्यार्थ्यांनी गावात फेरफटका मारत चिमण्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला. त्यानंतर पर्यावरण दिंडी काढून “झाडे वाचवा, चिमणी वाचवा” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला तो विद्यार्थ्यांनी सादर केलेला पथनाट्य प्रयोग. गावातील विविध चौकांमध्ये सादर करण्यात आलेल्या या नाट्यप्रयोगांनी उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केला.
“चित्ता गेला, डोडो गेला… आता कुणाचे नाव? चिमणी जाते की काय?” हा प्रश्न ऐकताच वातावरण क्षणभर स्तब्ध झाले.
विद्यार्थ्यांनी चिमण्यांची घटती संख्या आणि त्यामागील कारणे अत्यंत प्रभावीपणे मांडली. विशेष म्हणजे, या शाळेत गेल्या २० वर्षांपासून चिमणी संवर्धनाचा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. विद्यार्थी वर्षभर चिमण्यांसाठी अन्न-पाणी ठेवणे, कृत्रिम घरटी तयार करणे अशा उपक्रमांद्वारे त्यांची काळजी घेतात.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सकारात्मक परिणामही दिसून येत असून कामरगाव परिसरात चिमण्यांची संख्या वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याशिवाय, घरटी बनवण्याची स्पर्धा, पत्रलेखन, भेटकार्ड आणि कविता लेखन अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता व्यक्त केली.
कामरगावातील या छोट्याशा उपक्रमातून एक मोठा संदेश दिला जात आहे—जर आपण आज निसर्गाशी नातं जपलं नाही, तर उद्या “चिमणी” ही फक्त पुस्तकांपुरतीच उरेल.
म्हणूनच चला, आपणही पुढाकार घेऊया—झाडे लावूया, पाणी ठेवूया आणि चिमण्यांसाठी सुरक्षित घर तयार करूया.



