काँग्रेसला मोठा धक्का देवानंद पवार यांचा राजीनामा

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील बहुजन आणि मागास समाजाला डावलत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात काँग्रेसच्या उमेदवारी वाटपावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात दीड कोटी बंजारा समाज असूनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकाही बंजारा उमेदवाराला संधी दिली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत १७ पैकी ९ जागा मराठा-कुणबी समाजाला तर विधानसभा निवडणुकीत १०२ पैकी ५१ जागांवर याच समाजाला उमेदवारी देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.
पवार यांनी काँग्रेसमधील अंतर्गत हुकूमशाही आणि गटबाजीवरही टीका केली आहे. पक्षात सामाजिक न्यायाच्या फक्त गोष्टी होतात, पण प्रत्यक्षात बहुजनांच्या नेतृत्वांना पद्धतशीरपणे दडपले जाते, असेही त्यांनी म्हटले आहे. हे सर्व पाहता, काँग्रेस हा आता मागासवर्गीय व बहुजनांचा पक्ष राहिला नाही, असे सांगत त्यांनी जड अंतःकरणाने राजीनामा देत असल्याची घोषणा केली.



