अहमदाबाद विमान अपघातात वैमानिकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न? असोसिएशनकडून AAIB अहवालावर प्रश्न उपस्थित

अहमदाबाद : एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी तथ्यांवर आधारित नाही, असा आरोप करत एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (ALPA-India) ने एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या अपघातात 270 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ALPA चा दावा: वैमानिक दोषी दाखवण्याचा प्रयत्न
ALPA च्या मते, “तपासाची शैली आणि दिशा पायलटच्या चुकीकडे झुकणारी असून, ती एकतर्फी आणि अन्यायकारक आहे. ALPA इंडिया हे स्पष्ट करते की आम्ही या निष्कर्षांना मान्य करत नाही आणि संपूर्णपणे निष्पक्ष व वैज्ञानिक पद्धतीने चौकशी व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत.”
त्यांनी एएआयबीकडे मागणी केली आहे की ALPA च्या प्रतिनिधींना चौकशी प्रक्रियेत निरीक्षक म्हणून समाविष्ट केले जावे, जेणेकरून पारदर्शकता आणि वैमानिकांच्या जबाबदारीचा योग्य खुलासा होऊ शकेल.
AAIB चा अहवाल काय सांगतो?
12 जून 2025 रोजी एअर इंडिया फ्लाइट AI-171 या बोईंग 878-8 विमानाचे टेकऑफनंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन अचानक बंद पडले. अहवालात नमूद आहे की, इंधन कटऑफ स्विच ‘RUN’ मोडमधून अवघ्या एका सेकंदात ‘CUTOFF’ मोडमध्ये गेले, ज्यामुळे इंजिनमध्ये इंधन पुरवठा थांबला. त्याच वेळी, कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले की, “तू इंधन बंद का केलंस?”, तर दुसऱ्याने त्यावर नकार दिला.
तथापि, दोन्ही इंजिनमध्ये इंधन कपात कशी आणि का झाली, याचे ठोस स्पष्टीकरण अहवालात दिले गेलेले नाही.
ALPA ची भूमिका आणि आंतरराष्ट्रीय साथ
ALPA India ही International Federation of Airline Pilots Association (IFALPA) ची सहयोगी सदस्य संघटना असून, जागतिक स्तरावर वैमानिकांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचे ठरू शकतात.
- ALPA ची मागणी
निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी - ALPA प्रतिनिधींना चौकशी समितीत निरीक्षक म्हणून सहभागी करणे
- पायलटवर खापर फोडण्याची प्रवृत्ती थांबवणे
- AAIB कडून संपूर्ण तांत्रिक आणि लॉजिकल कारणांचा शोध घेणे



