काय बच्चू, तू गप्प का? सरकार करत नसेल तर काढ आंदोलनाचं शस्त्र!

बच्चू कडूंच्या निवासस्थानी गणेशोत्सवात अनोखा देखावा; शेतकरी, वंचित आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्न मांडणाऱ्या अनोख्या देखाव्यामुळे चर्चेत आला आहे. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतानाच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.
काय बच्चू, तू गप्प का? सरकार करत नसेल तर काढ आपलं आंदोलनाचं शस्त्र! अशी या देखाव्याची मध्यवर्ती थीम आहे. या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, एकल महिला, विधवा आणि इतर वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रतीकात्मक स्वरूपात मांडण्यात आले आहे.
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेचा मुद्दा, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, रानडुकरांकडून शेतीचे होणारे नुकसान, शेतकऱ्यांसमोरील बियाण्यांची समस्या आणि शेतीच्या नुकसानीचे प्रश्न या देखाव्यातून अधोरेखित करण्यात आले आहेत.
बालबळींचा हुंकार, वाघाचा वार, रानडुकरांचा कहर; गणराया, तूच वाचव आमचं वावर अन् संसार! या घोषवाक्यातून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या आहेत.
विशेषतः वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा संदेश या प्रतीकात्मक मांडणीतून देण्यात आला आहे.
यासोबतच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, एकल महिला आणि विधवा यांच्या प्रश्नांकडेही शासनाने लक्ष द्यावे, अशी भूमिका या देखाव्यातून मांडण्यात आली आहे.
कुरळपूर्णा येथे तीन दिवसांसाठी हा प्रतीकात्मक गणपती बसवण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सरकार आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि संबंधित घटकांना न्याय मिळावा, हा संदेश या संपूर्ण देखाव्यातून देण्यात आला आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांनी यापूर्वीही शेतकरी आणि इतर सामाजिक प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील या देखाव्यातून आंदोलनाच्या भूमिकेचा संदेश पुन्हा अधोरेखित करण्यात आल्याचे दिसून येते.



