नांदेड बाजार समितीत हळदीचे भाव कोसळले; शेतकरी संघटना आक्रमक, लिलाव बंदचा इशारा

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी व्यापाऱ्यांकडून हळदीचे भाव मुद्दाम पाडले जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या नांदेड बाजार समितीत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात हळद येत आहे. मात्र, हळदीला प्रतिक्विंटल 16 ते 17 हजार रुपये दर मिळणे अपेक्षित असताना व्यापारी केवळ 10 ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने हळद खरेदी करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.
यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. व्यापाऱ्यांकडून संगनमताने दर पाडले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, हळदीला योग्य दर न दिल्यास उद्यापासून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचा लिलाव बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हळदीला योग्य दर मिळाला नाही, तर आम्ही बाजार समिती आणि हळदीचा लिलाव बंद करू. व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली ही लूट सहन केली जाणार नाही.”
आता बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यावर काय भूमिका घेतात, याकडे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



