पारंपरिक शेतीला रामराम! नांदेडच्या शेतकऱ्याने केशर आंब्यातून कमावले लाखोंचे उत्पन्न

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी बातमी समोर आली आहे. पारंपरिक शेतीला बगल देत अर्धापुर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी फिरोज खान पठाण यांनी सहा एकरमध्ये केशर आंब्याची लागवड करून लाखोंचे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग दाखवला आहे.
चेनापूर गावातील फिरोज खान पठाण यांनी काही वर्षांपूर्वी पारंपरिक पिकांऐवजी फळबाग शेतीचा पर्याय स्वीकारला. त्यांनी आपल्या सहा एकर शेतात केशर आंब्याची बाग उभारली. सुरुवातीला हा प्रयोग धाडसी मानला जात होता, मात्र योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
सध्या त्यांच्या आंबा बागेतून दरवर्षी साधारण १५ ते १६ टन केशर आंब्याचे उत्पादन मिळत आहे. बागेची योग्य देखभाल, ठिबक सिंचन, पाण्याचे नियोजन आणि खत व्यवस्थापन यामुळे झाडांना भरघोस फळधारणा होत आहे.
या संपूर्ण बागेच्या देखभालीसाठी वर्षाला सुमारे एक लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, खर्च वजा जाता फिरोज खान पठाण यांना तब्बल ११ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत फळबाग शेती अधिक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
फिरोज खान पठाण म्हणाले, “बदलत्या काळात शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवे प्रयोग करायला हवेत. फळबाग शेतीतून कमी क्षेत्रातही अधिक उत्पन्न मिळू शकते.”
त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित झाले असून, अनेक जण आता केशर आंबा आणि इतर फळबाग पिकांकडे वळण्याचा विचार करत आहेत.
नांदेडमधील या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे की, योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक शेती पद्धतीचा वापर केला, तर शेतीतूनही लाखोंचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे.



