यूपीमध्ये भीषण आग; आई-मुलाचा मृत्यू, पती गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन मजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीत एका महिलेचा आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर पती गंभीर भाजल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील चिलकहर गावात सोमवारी पहाटे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, एका व्यावसायिक प्रतिष्ठानात अचानक आग लागली आणि काही वेळातच ती संपूर्ण इमारतीत पसरली.
या आगीत रिंकी (वय २२) आणि तिचा चार वर्षांचा मुलगा धीरज यांचा दम घुटल्याने मृत्यू झाला. तर रिंकीचे पती नीरज चौरसिया (वय २४) गंभीर भाजले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक ओमवीर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
मात्र आग इतकी भीषण होती की व्यावसायिक प्रतिष्ठानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला बराच वेळ झुंज द्यावी लागली.
सध्या आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जात आहे.



