रब्बीच्या भरघोस उत्पादनाने शेतकऱ्यांना दिलासा; होळीपूर्वी वाशिमची बाजारपेठ रंगतदार

वाशिम (प्रतिनिधी): वाशिम जिल्ह्यात खरिप हंगामातील पिकांना पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे. होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील बाजारपेठा रंग, पिचकाऱ्या आणि विविध साहित्याने सजल्या आहेत.
खरिप हंगामात सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. या परिस्थितीचा परिणाम दिवाळीसह इतर सणांवरही झाला होता.
मात्र रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याचे समाधानकारक उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या गहू आणि हरभऱ्याची काढणी सुरू असून शेतकरी बाजारात विक्रीसाठी माल आणत आहेत. हातात पैसा आल्याने होळी सण उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.
वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध प्रकारचे रंग, आकर्षक पिचकाऱ्या, फुगे, टोप्या, टी-शर्ट, डीजे साहित्य तसेच होळी पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी आहे. नैसर्गिक रंगांकडेही ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे.
लहान मुलांसह तरुणाईची बाजारात मोठी गर्दी होत असून दुकानदारांनी ग्राहकांसाठी विविध ऑफर्स आणि नवीन साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
रब्बी हंगामातील चांगल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्याने यंदाची होळी अधिक उत्साहात साजरी करण्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक अडचणीतून सावरत नागरिक पुन्हा एकदा सणांचा आनंद लुटताना दिसत असून संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.



