अमरावती: जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलेचा मृत्यू; काँग्रेस महिला आक्रमक, डॉक्टरांवर कारवाईची मागणी

अमरावती: जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरिन) कारभारावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात उपचारादरम्यान झालेल्या एका २८ वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारण तापले असून, काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात ठिय्या देत निवेदन सादर करण्यात आले.
नेमकी घटना काय?
भातकुली तालुक्यातील खारतडेगाव येथील रहिवासी पल्लवी भूषण गुडघे (वय २८) या महिलेला १२ जानेवारी रोजी उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पल्लवी यांचा मृत्यू झाला. पल्लवी यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता.
काँग्रेस महिलांची धडक
या प्रकरणाला २० दिवस उलटूनही ठोस कारवाई न झाल्याने काँग्रेस महिला आघाडीने मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय गाठले. यावेळी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषेत प्रशासनाला जाब विचारला.
- “गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी का घातले जात आहे?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
- संबंधित डॉक्टरांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सकांचे स्पष्टीकरण
या आंदोलनानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती नेमण्यात आली असून सखोल चौकशी सुरू आहे. जर चौकशीत डॉक्टरांचा हलगर्जीपणा सिद्ध झाला, तर त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.”



