AmravatiLatest News

निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा ठिय्या, टांगाव्दारे आले शेकडो नागरिक

चांदूर रेल्वे तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंग मासिक मानधन लाभार्थ्यांच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी मोठं आंदोलन रंगलं. टांगाव्दारे आलेल्या शेकडो लाभार्थ्यांनी तहसिल कार्यालयात ठिय्या धरत प्रशासनाला धसका दिला. नेमकं काय घडलं, कोण सहभागी झाले आणि काय दिलं प्रशासनाने आश्वासन?

चांदूर रेल्वे शहर आणि तालुक्यातील अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना गेल्या ७-८ महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंग मासिक मानधनाची रक्कम मिळालेली नाही. यामुळे या कुटुंबांची आर्थिक चूल विझण्याची वेळ आली आहे. याच मागणीसाठी आम आदमी पार्टी, शिवसेना (ठाकरे गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन छेडलं. २५ ऑगस्ट रोजी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वाखाली अग्रवाल धर्मशाळेजवळून मोर्चाची सुरुवात झाली. जुना मोटार स्टँडमार्गे मोर्चा तहसिल कार्यालयात पोहचला. काही लाभार्थी टांगाव्दारे आले होते. मोर्चामध्ये भजने, घोषणाबाजीसह लाभार्थ्यांचा संताप उफाळून आला. तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर तहसिलदार पूजा माटोडे यांच्यासोबत प्रतिनिधींनी चर्चा केली. यावेळी तहसिलदारांनी थकबाकी मानधनाबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात येईल, आधार सीडिंग आणि बँक लिंकिंग प्रक्रिया जलद होईल असे लेखी दिलासा देण्यात आला. आंदोलकांनी प्रशासनाला १ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून, त्यानंतर २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीला अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मोर्चात आप पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. वसंतराव ढोके, जिल्हा संघटक विलास वाडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष मनोज कडू यांसह अनेक नेते व शेकडो लाभार्थी उपस्थित होते.

योजनांचा लाभार्थ्यांना वेळेवर लाभ न मिळाल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करणारे हे आंदोलन. तहसिलदारांनी दिलेल्या आश्वासनाने हा संघर्ष काही काळासाठी स्थगित झाला असला तरी १ ऑक्टोबरनंतर काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button