नागपुरात शेअरिंग रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग; तृतीयपंथीय आरोपी अटकेत

नागपुरात महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या एका महिलेचा शेअरिंग रिक्षामध्ये विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तृतीयपंथीय आरोपीला अटक केली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.
ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआर मॉलमध्ये काम करणाऱ्या दोन महिला नेहमीप्रमाणे रात्री सुमारे दहा वाजता ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी शेअरिंग रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या.
याचवेळी त्यांच्या मागे वारंवार येणारा एक तृतीयपंथीय तेथे आला. रिक्षा आल्यानंतर दोन्ही महिला त्यात बसल्या आणि आरोपीही त्यांच्यासोबत रिक्षामध्ये बसला.
आरोपानुसार, रिक्षामध्ये फिर्यादीच्या शेजारी बसलेल्या आरोपीने, “तू मला ओळखत नाही का? माझ्याशी का बोलत नाही?” असे म्हणत महिलेच्या छातीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला.
घाबरलेल्या महिलेने तत्काळ आपल्या भावाला फोन करून क्रीडा चौकात बोलावले. रिक्षा तेथे पोहोचल्यानंतर महिलेने आणि तिच्या भावाने आरोपीला रोखून धरले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
इमामवाडा पोलिसांनी आरोपी काजल जग्गू तांबेकर (वय 30 वर्षे, रा. नंदनवन झोपडपट्टी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कोणतीही व्यक्ती—तिची लिंग ओळख काहीही असो—महिलांची छेडछाड किंवा विनयभंग केल्यास तिच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
या प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



