पाऊस ओसरला: पुढील २४ तासांत कोकण, मराठवाडा, विदर्भाचे हवामान कसे?

पुणे : मान्सून राज्यभरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली होती. मागील जवळपास दोन आठवडे राज्यात सर्वदूर पावासाची संततधार होती. विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. सध्या तिथे पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र मागील तीन ते चार दिवसांत विदर्भातील शहरात तुफान पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने पूरसदृशस्थिती निर्माण झाली होती. सध्या पूरस्थिती नियंत्रणात येत आहे.
विदर्भात यलो अलर्ट
विदर्भात पावसामुळे अनेक रस्ते मार्ग बंद झाले होते. तर काही ठिकाणी पुरामुळे पूल वाहून गेले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता पाऊस थांबल्यानंतर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा, कोकण, घाट परिसरात पावसाची काय स्थिती?
गेल्या २४ तासांत राज्यातील विविध भागात कोकण आणि घाट भागांत हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. काही दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसंच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहतील. यादरम्यान मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कमी दाबाचा पट्ट्याने पावसाची उघडीप
झारखंड परिसरात समुद्रसपाटीपासून जवळपास ५.८ किमी उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळेच त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर झाला असून अनेक भागात पावसाने उघडीप घेतली आहे.
कोकणातही पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. कोकणात भात लागवडीला जोर आला असून पावसाच्या चांगल्या सरींमुळे बळीराजा सुखावला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात शेतकऱ्यांमध्ये खुरपणी आणि मशागतीच्या कामांना वेग आला आहे.



