Accident NewsAccidentNewscitynewsLatest NewsMaharashtraMumbai

तळोज्यात भरधाव कारचा भीषण कहर; दोघांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

सीसीटीव्हीत कैद झाला अपघात; चालक फरार, शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-१० परिसरात भरधाव कारने घडविलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्यावरून जाणारे नागरिक, दुचाकीस्वार आणि इतर वाहनांना जोरदार धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, भरधाव वेगातील कारने क्षणार्धात रस्त्यावरील अनेक वाहनांना आणि नागरिकांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३५ वर्षीय नदीम खान यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की एका मोपेडचे अक्षरशः दोन तुकडे झाले. याशिवाय तीन दुचाकी, एक रिक्षा आणि एका टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडवून आणल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार विशेष पथके नियुक्त केली असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, अपघातावेळी चालक अल्पवयीन होता का, तसेच तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता का, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे भरधाव वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून फरार चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button