अमरावती बसस्थानकातील अनागोंदीवर परिवहन मंत्र्यांचा संताप; दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

अमरावती बसस्थानकातील अस्वच्छता, ढिसाळ व्यवस्थापन आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर राज्याचे परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरा केलेल्या औचक पाहणीत बसस्थानकातील अव्यवस्था पाहून संतप्त झालेल्या मंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अमरावती दौऱ्यावर असताना रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या पाहणीत बसस्थानक परिसरातील वास्तव समोर आले.
पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरात अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेली घाण, अपुरी स्वच्छता व्यवस्था, प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांची दयनीय अवस्था तसेच चालक-वाहक व्यवस्थेतील अनेक त्रुटी मंत्र्यांच्या निदर्शनास आल्या. प्रवाशांना बसस्थानकात भेडसावणाऱ्या गैरसोयी आणि प्रशासनाची उदासीनता पाहून मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले.
बसस्थानकाच्या कारभाराबाबत गंभीर नाराजी व्यक्त करत त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. यावेळी ढिसाळ कामकाज आणि निष्काळजीपणाबद्दल विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मंत्र्यांच्या या अचानक कारवाईमुळे एसटी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून राज्यातील इतर बसस्थानकांमधील व्यवस्थापनावरही आता लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही एसटी प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. बसस्थानक परिसरातील स्वच्छता, प्रवाशांच्या सुविधा आणि प्रशासनातील शिस्त याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती बसस्थानकातील व्यवस्थापनावर झालेली ही थेट कारवाई राज्यभरातील परिवहन विभागासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आता या कारवाईनंतर बसस्थानकातील सुविधा आणि स्वच्छतेत कितपत सुधारणा होते, तसेच एसटी प्रशासन प्रवाशांचा विश्वास परत मिळवण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


