citynewsLatest NewsMaharashtraWeather Report

विदर्भ पेटला! उष्माघात जीवावर बेतला; आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून विदर्भ अक्षरशः तापला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चंद्रपूरमध्ये तापमान तब्बल ४७.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत असून विदर्भात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा सुती कपडा वापरावा तसेच वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे रुग्णालयांमध्ये उष्माघात आणि डिहायड्रेशनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button