जळगाव जामोदमध्ये हृदयद्रावक घटना! चार चिमुकल्यांसह व्यक्तीची विहिरीत उडी; पाच जणांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील राजुरा धरण परिसरात एका व्यक्तीने आपल्या चार लहान मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा धरणाजवळील एका विहिरीमध्ये पाच मृतदेह आढळून आले. स्थानिक नागरिकांना विहिरीत मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव आणि पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मृतांमध्ये एका प्रौढ व्यक्तीसह चार लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी किंवा अन्य कारणांचा तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जामोद तालुका हादरला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून तपासानंतरच संपूर्ण घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



