टरबूज खाल्ल्यानंतर मृत्यू प्रकरण; ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन’ आढळलं नाही, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूच्या धक्कादायक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या रुग्णालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्राथमिक अहवालात मृतांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन’ आढळून आलेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी (6 मे) दिली.
मात्र, या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, अंतिम सत्य फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानंतरच समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबईतील इस्माईल कुर्टे रोडवरील घारी मोहल्ला परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने 25 एप्रिलच्या रात्री नातेवाईकांसाठी छोटेखानी गेट-टुगेदर आयोजित केलं होतं. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता.
नातेवाईक घरी गेल्यानंतर 26 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास अब्दुल्ला डोकाडिया (40), त्यांची पत्नी नासरीन (35), तसेच मुली आयेशा (16) आणि झैनब (13) यांनी टरबूज खाल्लं होतं.
यानंतर काही वेळातच कुटुंबीयांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला अन्न विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
मात्र आता मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्राथमिक अहवालात मृतांच्या शरीरात कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन आढळलं नसल्याने या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे. पोलिस आणि आरोग्य विभाग या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी विविध अंगांनी तपास करत आहेत.
फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता या अहवालाकडे लागलं आहे.



