रामटेक तालुक्यातील सोनेघाटमध्ये भीषण पाणीटंचाई; दूषित पाण्याचा आरोप, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे रामटेक तालुक्यातील सोनेघाट गावात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनेघाट ग्रामपंचायत परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे गावातील अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब अंतर पायी जावे लागत असून महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
गावातील पाणीप्रश्नामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून संताप वाढू लागला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतचे माजी सदस्य जितेंद्र वालोकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “पाणीटंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, गावातील सार्वजनिक पिण्याच्या विहिरीजवळ वीटभट्टीवरील काही लोकांकडून आंघोळ, शौच आणि इतर अस्वच्छ कृत्ये केली जात आहेत. धक्कादायक म्हणजे, याच विहिरीतील पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला असून दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. पुढील ८ दिवसांत पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असताना सोनेघाटमध्ये त्याच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाची किती तातडीने दखल घेते, की ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



