citynewsIndia NewsLatest News

मणिपूर पुन्हा हिंसाचाराच्या विळख्यात; ५ जणांचा मृत्यू, अद्याप एकाही आरोपीला अटक नाही

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराने डोके वर काढले असून, ७ एप्रिलपासून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र, या सर्व घटनांमध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले असून, सुरक्षा दलांशी त्यांची झटापटही झाली आहे.

७ एप्रिल रोजी बिष्णुपूर जिल्ह्यातील त्रोंग्लाओबी गावात एका घरावर स्फोटक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाच वर्षांचा मुलगा आणि त्याची सहा महिन्यांची बहीण ठार झाली, तर त्यांच्या आईला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. स्थानिकांनी या हल्ल्यामागील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

या घटनेनंतर बिष्णुपूर-चुराचंदपूर मार्ग मागील १२ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा, म्हणजेच एनआयएच्या तपासातही अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः मुलांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

आरोपी अद्याप सापडले नसल्यामुळे मागील आठवडाभरात अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन केले. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून “आरोपींना अटक करा” अशी मागणी केली. काही ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. या संघर्षात अनेक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली असून, इंटरनेट सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button