वाशिममध्ये ‘पॅनिक बाइंग’मुळे कृत्रिम इंधन टंचाई; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

वाशिम :
जिल्ह्यातील कामरगाव आणि कारंजा लाड परिसरात सध्या इंधन टंचाई नसतानाही भीतीमुळे निर्माण झालेल्या ‘पॅनिक बाइंग’मुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून काही तासांतच साठा संपत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ही टंचाई प्रत्यक्षात नसून अफवांमुळे निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने ट्रॅक्टर आणि जेसीबीसाठी इंधनाची गरज असते. मात्र भीतीपोटी नागरिक गरजेपेक्षा अनेक पटीने अधिक इंधन खरेदी करत आहेत.
जिथे १०० रुपयांचे पेट्रोल पुरेसे आहे, तिथे नागरिक थेट १००० रुपयांचे इंधन भरत आहेत. शेतकरीदेखील २००० रुपयांच्या डिझेलऐवजी १०,००० रुपयांचे डिझेल भरून साठवून ठेवत असल्याने पेट्रोल पंपांवर कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, पंपांवर साठा कमी होत असला तरी नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन साठवले जात आहे. काही ठिकाणी १००० ते ५००० लिटरपर्यंत इंधन साठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही साठवणूक केवळ टंचाई वाढवत नाही, तर मोठ्या अपघाताचा धोका देखील निर्माण करत आहे.
दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की इंधनाचा साठा पुरेसा आहे आणि नागरिकांनी घाबरून न जाता केवळ गरजेपुरतेच इंधन घ्यावे. मात्र, सध्या तरी कामरगाव परिसरात ‘पॅनिक बाइंग’ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
एकूणच, टंचाईपेक्षा भीती अधिक धोकादायक ठरत असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे. संयम राखून जबाबदारीने वागल्यास ही कृत्रिम टंचाई सहज नियंत्रणात येऊ शकते, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.



