पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेने राज्यात गोंधळ; पंपांवर लांबच लांब रांगा, प्रशासनाचे आवाहन

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवेमुळे राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, कल्याण, डोंबिवली, परभणी, बीड आणि नांदेड या शहरांतील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन संपणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साठा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही ठिकाणी ‘नो स्टॉक’चे फलकही लावण्यात आले.
ठाणे-कल्याण-डोंबिवली परिसरात परिस्थिती काही ठिकाणी नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले, तर काही भागात नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. मात्र, मुंबईतील काही भागांमध्ये तुलनेने शांतता दिसून आली असून, मार्बल हिल आणि देसाई रोड परिसरातील काही पंपांवर गर्दी नसल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रशासनानेही वारंवार आवाहन करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठा करू नये, असे सांगितले आहे.
इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी भारतात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.



