नागौरमध्ये वृद्धेची निर्घृण हत्या; दागिन्यांसाठी शेजाऱ्यानेच केला खून

नागौर : राजस्थानातील नागौर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दागिन्यांच्या लालसेपोटी एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून निर्जन ठिकाणी फेकण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
पालडी कलान गावातील रहिवासी नथी देवी बावरी (७५) या १६ मार्च रोजी सकाळी गुरांसाठी चारा आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या अंगावर अंदाजे ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र, त्या संध्याकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला, पण त्यांचा काहीच मागमूस लागला नाही.
दुसऱ्या दिवशी, १७ मार्च रोजी पाचरांडा गावाजवळील झुडपांमध्ये एका प्लास्टिकच्या पोत्यात महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. आरोपीने ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या पोत्यांत भरून फेकल्याचे समोर आले. घटनास्थळावरून महिलेचे सर्व दागिने गायब असल्याचेही स्पष्ट झाले.
नागौर पोलीस अधीक्षक रोशन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने तपास करण्यात आला. घटनास्थळी सापडलेल्या एका चपलेमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. तसेच, एका संशयिताच्या घरात रक्ताचे डाग आढळल्याने तपासाची दिशा स्पष्ट झाली.
तांत्रिक तपासात ३०० हून अधिक मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासण्यात आले. अखेर या पुराव्यांच्या आधारे २० मार्च रोजी पोलिसांनी पीडितेचा शेजारी मुकेश भारती (३८) याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, नथी देवी या चाऱ्यासाठी आरोपीच्या घरी गेल्या असताना त्याने लोखंडी रॉड किंवा कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला करून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून तीन पोत्यांत भरून कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. पोलिसांनी हत्यार आणि चोरी केलेले दागिने जप्त केले आहेत.
प्राथमिक तपासात दागिन्यांची लूट हा मुख्य हेतू असल्याचे दिसत असले, तरी सुमारे ३० गुंठे जमिनीच्या वादाचाही कोन तपासला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, नथी देवींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्व अवशेष सापडल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. अखेर उर्वरित अवशेष सापडल्यानंतर डेगाना येथे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक होऊन अंत्यविधी पार पडले.
या अमानुष घटनेमुळे नागौर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.



